Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र हादरला… देहूरोडमध्ये रक्तरंजित ‘एक्झिक्युशन स्टाईल’ हल्ला; ९ गोळ्यांनी भाजप कार्यकर्त्याची हत्या, शहर दहशतीच्या छायेत

 महाराष्ट्र हादरला… देहूरोडमध्ये रक्तरंजित ‘एक्झिक्युशन स्टाईल’ हल्ला; ९ गोळ्यांनी भाजप कार्यकर्त्याची हत्या, शहर दहशतीच्या छायेत 




मुख्य कार्यकारी संपादक अभिजित सिद्धार्थ चव्हाण 


पुणे जिल्ह्यातील देहू रोड परिसरात काल मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या थरारक आणि अत्यंत धक्कादायक गोळीबाराने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. गुन्हेगारीचा वाढता प्रभाव आणि संघटित टोळ्यांची हालचाल पुन्हा एकदा समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भाजपचा सक्रिय कार्यकर्ता रमेश रेड्डी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हल्ला चढवला. रात्री उशिरा त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत हल्लेखोरांनी त्यांना अडवले आणि क्षणातच गोळीबार सुरू केला. एक-दोन नव्हे तर तब्बल ९ राऊंड फायरिंग करण्यात आली. हा हल्ला ‘टार्गेट किलिंग’ असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, गोळीबाराचा आवाज इतका प्रचंड होता की परिसरातील नागरिक घाबरून घराबाहेर पडले. काही सेकंदांतच रेड्डी हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. डोक्यात लागलेली गोळी जीवघेणी ठरली. हल्लेखोरांनी काम तमाम झाल्याची खात्री करून घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती समोर येत आहे.

गोळीबारानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. जखमी अवस्थेत रेड्डी यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच नातेवाईक, मित्र आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. आक्रोश, संताप आणि भीती यामुळे वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण बनले.

संतप्त जमावाने जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, मृतदेह पुढील तपासणीसाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालय येथे हलवण्यात आला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने तपास करत महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून, गोळ्यांचे कवच, सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्सच्या आधारे तपासाची दिशा ठरवली जात आहे.

पोलिसांनी संपूर्ण शहरात नाकाबंदी करत संशयित वाहनांची तपासणी सुरू केली आहे. विशेष पथके तयार करून आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू असून, काही संशयितांची नावे समोर येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या प्रकरणामागे जुने वाद, राजकीय स्पर्धा, आर्थिक व्यवहार की गुन्हेगारी टोळ्यांचा हात आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.

या हत्येनंतर देहूरोड बाजारपेठ पूर्णपणे ठप्प झाली. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत या घटनेचा निषेध केला. अनेक ठिकाणी भीतीमुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात आहे.

देहूरोडमधील ही घटना केवळ एक हत्या नसून, शहरातील वाढत्या गुन्हेगारीचे गंभीर संकेत मानले जात आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या अशा घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये एकच चर्चा — “आता सुरक्षित कोण?”

ही रक्तरंजित रात्र देहूरोडकरांच्या मनात भीतीची खोल जखम करून गेली आहे… आणि प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या